Leh Ladakh Diaries

दिवस पहिला – ०९ जुलै २०१२

काल रात्री सगळी तयारी होईपर्यंत साडेअकरा वाजून गेले, आणि डोळा लागेपर्यंत अडीच..

आज सकाळी आठ – साडेआठ वाजताच मी, राहुल समुद्रावर पोचलो, संजू परस्पर तिकडेच येणार होता, कारण ह्या सगळ्या प्रवासाची सुरुवात शब्दश: “समुद्र सपाटी” पासून करायची होती, शुभेच्छा द्यायला मित्र आणि नगराध्यक्ष मिलिंदराव कीर येणार होते, त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, आणि जोंधळ्या मारुतीला गाह्राणे घालून निघायचं, असा बेत ठरला होता.

संजू पोचला, पण त्याच्या चेहेऱ्यावरून काहीतरी बिनसल्याचं जाणवलं, आणि त्याचा हात हातात घेतल्यावर लक्षात आलं, अंगात चांगलाच ताप होता. गेले ४/५ दिवस केलेली जागरणं, निघण्याआधी काम संपवण्या साठी केलेली धावपळ- दगदग आता बाहेर पडत होती.
“डॉक्टरला फोन केलाय, जाताना ५ मिनिटं थांबून जाऊया… “बस्स!! परत चर्चा नाही!!”

पावणे नऊ च्या दरम्यान मिलिंदराव आले, आम्हाला काहीही पूर्व कल्पना न देता त्यांनी बरीच तयारी केली होती की.. दोन तीन पत्रकार, फोटोग्राफर, हार तुरे… एकदम सरकारी काम!! त्यांनी वेळ न दवडता निरोपाच्या मोजक्या शब्दात गाड्या सावकाश चालवायचा, सांभाळून जाण्याचा, दररोज घरी आठवणीने फोन करायचा प्रेमळ सल्ला दिला आणि मग सर्वांच्या वतीने सर्व रत्नागिरीकरांतर्फे आमच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

साडेनऊ, पावणे दहाला मांडवीतून निघालो, संजू तर “पेटला” होता, तो आणि राहुल दोघे ठरल्याप्रमाणे डॉक्टर कडे गेले, वैद्यराजांनी औषध तयार करून ठेवली असतील… ती घेऊन त्यांनी माझ्या घरी यायचं, व मग पुढे निघायचं ठरलं, पण आपण ठरवतो एक आणि होतं वेगळंच…

डॉक्टरनी संजूला बघितलं, १ ताप होता, म्हणून सरळ एक गोळी देवून तिथेच दवाखान्यात झोपवून ठेवलं, म्हणाले ताप उतरेपर्यंत हलायचं नाही..दोन तासांत ताप उतरला तर ठीक, नाहीतर आजचं जाणं रद्द…..
सुदैवाने दुपारी एक च्या दरम्यान संजूचा ताप पूर्णपणे उतरला, आणि मग डॉक्टरनी परत तपासून, वेगळ्या गोळ्या / पुड्या बांधून दिल्या, आणि मग पुढे निघायची परवानगी दिली, ती सुद्धा दररोज त्यांना फोनवर रिपोर्ट करायच्या अटीवर…

अश्या सगळ्यांच्या परवानग्या- निरोप घेऊन निघेपर्यंत दुपारचा दीड वाजला. मग मात्र जास्ती वेळ न काढता रत्नागिरीतून बाहेर पडलो, तरी हातखम्ब्यात पेट्रोल पंपावर १५ / २० मिनिटं गेलीच..
N.H. 17 चालू झाला आणि डोळ्यासमोरून एक एक आठवणी – घटना क्रम जावू लागले….

******

१९८३-८४ पासून YHAI ने भटकायचं कसं ते शिकवलं, एक दिशा दिली. हिमालयाने वेड लावलं ते १९८८ सालच्या ‘पोखरा व्हेली’ ट्रेक ने….. पोखरा शहरात भाड्याच्या मोटरसायकल घेउन फिरायची सोय होती, अनेक लोक तसे हिंडत, मजा वाटली ते बघून.

१९८८ पासून NCC मधून (संजू पाटील ची ओळख तेव्हाचीच ) महाराष्ट्रा बाहेरचा प्रदेश बघायची सवय होऊन गेली, एक दोन टूर कंपन्यांबरोबर फिरलो आणि मग जाणवलं की हे असं बस ने – टुरिस्ट म्हणून दुसऱ्यांच्या घड्याळाला बांधून घेऊन हिंडण्यापेक्षा स्वत: पाहिजे तिथे , पाहिजे तेंव्हा , आणि पाहिजे तितका वेळ थांबत फिरता आलं पाहिजे. हिमालयातल्या ‘रस्त्यांवर ‘ गाडी चालवायचं स्वप्न साधारणतः तेंव्हापासूनच पडायला लागलं….

तसं कोकण रेल्वे च्या कामानिमित्ताने कंपनीची कावासाकी बजाज घेउन १९९२ पासून हिंडत होतो, दीड – दोन वर्षात निदान लाखभर किलोमीटर भटकलो होतो, पण ते काम म्हणून….

१९९५ पासून मग हमारा बजाज.. रत्नागिरी- कोल्हापूर, रत्नागिरी- चिपळूण असे २००, २५० किमीचे प्रवास बाबांच्या स्कुटरने होत होते, पण तो पल्ला पण खूप वाटायचा तेंव्हा…. कारण ते फिरणं पण ‘काम’ होतं…

१९९७ ला पहिली १०० सी सी मोटरसायकल घेतली, आणि मग वेध लागले ते कुठेतरी लांब भटकायला जायचे…एव्हाना मी नीट गाडी चालवू शकतो ह्याची खात्री घरच्या वडीलधाऱ्यांना झाली होती. मग सुरु झाल्या भटकंती या प्रकारात मोडणाऱ्या उनाडक्या….

२००४ ला १५० सीसी ची गाडी घेतली आणि मग मात्र ”उधळलो”!!
आवाक्यातल्या, जवळच्या ठिकाणांची यादी वाढत होती, पण त्याबरोबर एकूणच जबाबदार्`या पण.. त्यामुळे जवळच्या उनाडक्या कमी होऊन वर्षातून एकदाच उनाडायला जायचं चालू झालं, आणि परत लेह(Leh) च्या भुताने मन काबीज केलं.

२००४ ला घरात अधिकृत घोषणा केली की मी बाईक ने लेह(Leh) ला जाणार… पण कोणी जास्ती मनावर घेतलं नाही…
२००५, २००६ , २००७…… घरच्यांना आता ह्या ” लांडगा आला रें आला…” ची सवय झाली होती बहुतेक, दरवर्षी आधी उत्साह दाखवणारे मित्र जायची तारीख महिन्यावर आली की टांग मारतात हे घरात कळून चुकलं होतं.

२००८:- १९८६-८७ पासूनचा माझा ट्रेकिंगचा पार्टनर शेखर मुकादमला म्हणालो, काही झालं तरी या वर्षी जायचं… मार्च पासून तयारी चालू केली, मुंबईचे एक ओळखीचे आघरकर नावाचे गृहस्थ, टूर नेतात ते म्हणाले, “माझ्या तारखांना या, म्हणजे काही अडचण आली तर आमची गाडी पुढे – मागे असेल,….. बघू म्हणालो..
आणि तयारी चालू ठेवली. सर्व्हे ची कामं उरकंत पावसाळ्याची वाट बघणं चालू झालं ……..

******

नेमेची येतो पावसाळा प्रमाणे याही वर्षी ३ जणांनी ‘जमणार नाही ‘ म्हणून सांगितलं, एकाला घरचं काम होतं, दोघांना रजा मिळत नव्हती. असो.. मी आणि शेखरने जायचं पक्क केलं, पण दोघंच आहोत हे कळाल्यावर दोघांच्याही घरातून “गाडीने जायचं नाही” असा विरोधी सूर निघायला लागला , शेवटी हार मानून मध्यममार्ग काढला, आणि आघारकारांबरोबर लेह – लडाख(Leh – Ladakh) ची टूर टेम्पो ट्राव्हलर – सुमो ने करून आलो…

अमरनाथ यात्रे वेळी श्रीनगर तर तोंडपाठ झालं होतच. बालताल च्या मुक्कामावरून ‘जोझी ला ‘ कडे जाणारा रस्ता दिसायचा – बोलवायचा… .. त्यापुढे कारगील – लेह – लडाख(Kargil – Leh – Ladakh) !! खडतर… कठीण… पण एक नक्की झालं…. या रस्त्यावरून बाईकने जायची इच्छा अजून तीव्र झाली. ऑगस्ट मध्ये लेहहून परत आल्यावर संजू पाटीलने भर बाजारात दोघानाही शिव्या घातल्या… तो तर लेह(Leh) साठी कधीचा (१९९६ पासून ) तयार होता ..

२०१२ :- जेंव्हा जेंव्हा संजू भेटत होता तेंव्हा “नक्की ना रे ?” ह्या एका प्रश्नात पुढची तयारी करायला हुरूप येत होता, ह्या वेळी माझ्याबरोबर मुंबईचा एक आर्किटेक्ट मित्र सुशील, आणि त्याचे २ मित्र येणार होते, मी, संजू पाटील, संजू वैशंपायन , राहुल सुर्वे असे रत्नागिरीहून आणि ते तिघे मुंबईहून .. ७ जण जायचं पक्के झालो, आणि पुढच्या तयारीला लागलो.

दोन्ही संजू, राहुल बरोबर पहिली अधिकृत मिटींग झाली ती रत्नागिरीचं ग्रामदैवत “भैरीबुवा” च्या पायरीवर, संजू वैशंपायन म्हणाला – पहिली मिटींग “भैरीबुवा” च्या पायाशी झाली ना, आता काहीही अडचण – विघ्न येणार नाही….. झालंही तसंच… त्या मिटींग नंतर तो जो गायब झाला, तो मला, राहुलला आणि संजू पाटीलला डायरेक्ट ऑगस्ट मध्ये भेटला !!!!

साधारण कार्यक्रम रूपरेषा :-

  • १ला दिवस रत्नागिरी ते मनोर ( ४१० किमी )
  • २रा दिवस मनोर ते अहमदाबाद ( ४४५ किमी )
  • ३रा दिवस अहमदाबाद ते अजमेर ( ५२५ किमी )
  • ४था दिवस विश्रांती – (राखीव )
  • ५वा दिवस अजमेर ते पानिपत ( ४६२ किमी )
  • ६वा दिवस पानिपत ते पठाणकोट ( ३९० किमी )
  • ७ वा दिवस पठाणकोट ते श्रीनगर ( ३६० किमी)
  • ८ वा दिवस ( विश्रांती – दुरुस्त्या इ. )
  • ९वा दिवस श्रीनगर ते कारगील ( २०५ किमी )
  • १० वा दिवस कारगील ते लेह ( २३० किमी )
  • ११वा दिवस लेह दर्शन, इनर लाईन परमीट इ.
  • १२, १३, १४, १५वा दिवस लेह व परिसर दर्शन
  • १६ वा दिवस लेह ते सारचू , (२२० किमी )
  • १७ वा दिवस सारचू ते मानली ( २३० किमी )
  • १८ वा दिवस मानली दर्शन
  • १९ वा दिवस मानली ते चंदिगड ( २९० किमी)
  • २० वा दिवस चंदिगड ते दिल्ली ( २५० किमी )
  • २१ वा दिवस गाड्या लगेज करणे
  • २२ वा दिवस दिल्ली ते रत्नागिरी..!!

असं ठरल्यावर २३ दिवस लागणार म्हंटल्यावर माझ्या आर्किटेक्ट मित्राने कुरकुर चालू केली, अर्थात त्याचं पण बरोबर होतं, खाजगी नोकरीत एवढी रजा शक्य नव्हती, त्यामुळे तो गळण्याची शक्यता वाढली, तरी त्याने शर्थीने प्रयत्न केला आणि परतीच्या प्रवासाची तिकिटे काढायच्या आधी एक दिवस ‘शक्य नाही’ असं कळवलं, तो नाही म्हणून त्याचे दोन्ही मित्र पण नाहीत.. असो.. गळती लागली… ७ जणांचे ३ जण झालो….

त्यातही राहुल सुर्वे अजून टेम्पररी नोकरीत … त्यामुळे तो यायला तयार होता, पण त्याचा साहेब सोडायला तयार नव्हता … बिलिंग सेक्शन चा माणूस जवळ जवळ एक महिना नाही म्हणजे गोंधळाला आमंत्रण … पण राहुल ची तयारी चालू होती, येताना दिल्ली पासून ट्रेन ने यायचं ठरवलं नाहीतर त्या दोघांच्या रजा संपत होत्या. दिल्ली – रत्नागिरी तिकिटं वेगवेगळ्या ३ दिवसांची आणि तिघांची वेगळी वेगळी काढली, ऐन वेळी गडबड नको…

७ जुलै:- शेवटी राहुलने “नोकरी सोडतो” असं सांगितल्यावर साहेबाने त्याची रजा मंजूर केली, ( गंमत म्हणजे ह्या साहेबाचा ” वरिष्ठ साहेब ” जो माझा १९८५ पासूनचा ट्रेकर मित्र , तो राहुलला लेह(Leh) ला जायला प्रोत्साहन देत होता..) मग राहुल ८ ला सकाळी उड्या मारत आला…” येतोय ” … हुश्श् … त्याच्या पेक्षा मोठा सुस्कारा मी सोडला… नाहीतर परत दोघं……

८ जुलै :- सगळा दिवस मग गडबडीत गेला, संजूच्या ‘अपाचे’ ला सामान बांधण्यासाठी उजव्या बाजूला बसेल अशी एक फ्रेम धनंजय कानिटकरने पटकन करून दिली, मला माझ्या ‘पल्सर’चं जुनं साडीगार्ड तोडून उलटं करून उजवीकडे त्यानेच लावून दिलं होतं, त्याचा खुपच उपयोग झाला.

राहुलची एकच मोठी सॅक होती, पण संजू आणि माझ्याकडे ३, एकात सर्व कपडे, कागदपत्र, येतानाची ट्रेन ची तिकिटं, दुसरीत गाडी दुरुस्तीचं सगळं टूलकीट- यात २ जादा टायर ट्यूब, पंक्चर काढायची सर्व हत्यारं, हवा भरायचा पायपंप, बॅग दुरुस्तीचे पट्टे, इ. व तिसऱ्या ब्यागेत खादाडीचे पदार्थ.. घरच्यांनी तर मी दुष्काळी भागात जातोय असा समज करून घेतल्याने हिचा आकार जरा मोठा..कारण जाताना खादाडी आणि येताना खरेदी केलेलं सामान ठेवता येईल अशी योजना !! हे सगळं सामान मोटरसायकलवर नीट आणि पटापट बांधायची २ – ३ वेळा सवय केली, तरी १० मिनिटं लागत होती. सगळं मनासारखं झालं ते रात्री साडेअकराला….

******

राहुल आणि संजूने हाका – हॉर्न मारून थांबवल्यावर भानावर आलो.पावणेचार वाजले होते, चिपळूणचा बहादूरशेख नाका .. एक दीड वाजता निघाल्यावर विचारांच्या तंद्रीत चिपळूण आलं होतं – भूक पण लागली होती, मग तिथल्याच हॉटेलमध्ये थांबून थोडं खाऊन घेतलं, एव्हाना आमच्या रत्नागिरी – लेह( Ratnagiri – Leh) सफरीची बातमी रत्नागिरीत पसरली होती..

पत्रकार मित्रांचे फोन सुरु झाले.. “आम्हाला का कळवलं नाही ? सुरुवात कव्हर करायला आलो असतो.. इ.इ…. मग मकरंद पटवर्धन ने तर फोनवरच सगळा कार्यक्रम विचारून बातमी बनवली. चिपळूण मधून निघेपर्यंत साडेचार वाजले, म्हणजे ठरल्यावेळेपेक्षा ५ तास मागे … बापरे!!!

चिपळूण मधून निघाल्यावर मात्र फार कुठे थांबायचं नाही असं ठरवलं..वाटेत एकदा थांबलो ते पाऊस चालू झाला म्हणून रेनकोट घालायला, आणि मग खेडमध्ये राहुलच्या गाडीची मराठी नंबरप्लेट बदलून इंग्रजी लावायला.. हो… उद्या महाराष्ट्राबाहेर पडल्यावर त्रास नको.

पाउस त्रास देत होताच,पण कशेडी घाट उतरून रायगड जिल्हा सुरु झाल्यावर रस्त्यावरचे खड्डे पण वाढले, महाड च्या पुढे तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था.. जोडीला पाऊस आणि वाढलेली वाहनांची वर्दळ .. एकंदरीत आज ठरल्या मुक्कामी ‘ मनोर’ ला पोचणार नाही हे निश्चित झालं, पण मग रात्री ११ पर्यंत जमेल तेवढे पुढे जायचं ठरलं , निदान पनवेल- ठाण्यापर्यंत.

आपण रत्नागिरीकर खड्डेमुक्त- भारनियमन मुक्त असल्याने खूप सुखी आहोत, पण हे सुख रत्नागिरीच्या बाहेर गेल्याशिवाय लक्षात येत नाही , इथे रत्नागिरीत ‘घर की मुर्गी- दाल बराबर..” असो..

खड्डे- पाऊस ह्यामुळे वेगावर बऱ्यापैकी परिणाम होत होता, कदाचित घरच्या लोकांचं ” सावकाश जा रे ” फारच मनावर घेतलं असावं, पण पहिल्याच दिवशी सुमारे ३ तास (१२० किमी ) मागे राहिलो आणि रात्री नवी मुंबईला दादाकडे ‘सी वूड्स’ मध्ये मुक्काम ठोकला. पहिल्याच दिवसभरात एकूण ३१५ किमी प्रवास झाला, (दुपारी एक ते रात्री ११.)

क्रमशः

– त्रिविक्रम शेंड्ये

(०९ जुलै २०१२)

NOTE :

COVID-19 Related Government Imposed Restrictions Prevail At A Few Locations.
For More Details Get In Touch With Us At [email protected] Or Call Us At +91-9420213309

Scheduled Tours :

Batch No.DateStarting PointOccupancy

Follow us on :

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Read More

लडाखडते दिवस – भाग ७ – त्रिविक्रम शेंड्ये (Leh – Ladakh Diaries 2012)

दिवस सातवा – १५ जुलै २०१२ सकाळी ६.३० लाच दरवाजा हलकेच ठोठावून रूम अटेन्डट चहा घेऊन आला..टेबलावर चहा…
Read More